लातूर, दि.30, अनिल कोकने
:- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये येणारी संभाव्य तिसरी लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील लसीकरण मोहीम ही लसीच्या उपलब्धतेनुसार राबविली जात आहे. जोपर्यंत संपूर्ण देश, महाराष्ट्र व आपल्या जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, ॲड. किरण जाधव, समेद पटेल, रोटरी क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश मोतीपवळे, रिलायन्स फाउंडेशनचे सत्यजित भोसले, अनुप देवणीकर राजगोपाल राठी, डॉक्टर माया कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पालक मंत्री देशमुख पुढे म्हणाले की, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मुळे गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना चांगला फायदा होतो तसेच वेंटिलेटर बेड मिळेपर्यंत ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे.त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविले जाऊ शकतात. तरी रोटरी क्लब मार्फत देण्यात आलेले हे 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आरोग्य विभागाने आवश्यकतेनुसार वापरावेत. तर रिलायन्स फाऊंडेशन ने दिलेले 5000 मास्क हे गरजू लोकांना तसेच फ्रंट लाईन वर्कर याना द्यावेत त्यांनी सूचित केले.
शासन व प्रशासन संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुशंगाने विविध उपकरणे व साहित्य खरेदी करत असून जिल्ह्यात पुरेसा औषधी साठा ही निर्माण केला जाणार आहे तरी नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे हलगर्जी न करता प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.
कोविड मुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील मुलांना जोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभे राहत नाहीत तोपर्यंत त्यांचे पालकत्व प्रशासनाकडे असेल असे सांगून पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. विविध सामाजिक संस्था कडून कोरोना महामारी विरुद्धच्या लढ्याला जी मदत दिली जात आहे ती फार मोलाची असून सर्व सामाजिक संस्थांनी या कार्यात यापुढील काळातही असेच सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.
रोटरी क्लब लातूर ही अत्यंत संवेदनशील सामाजिक संस्था असून लातूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनी प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केलेले आहे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सांगून रोटरी क्लब लातूर व रिलायन्स फाउंडेशन च्या कामाचे कौतुक केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मोतीपवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटेरियन सुधीर यांनी केले तर आभार राजगोपाल राठी यांनी मानले.